पणजी : पुढारी वृत्तसेवा
उड्डाणपूल व्हावा यासाठी पर्वरी आणि उत्तर गोव्यातील नागरिकांनी त्रास सहन केला आहे. त्यामुळे त्यांना नव्या उड्डाणपुलाचा लाभ मिळालाच हवा. स्थानिकांच्या भावना विचारात घेऊन निर्बंधांबाबत सरकारने तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी सांगितले.
पर्वरीत महामार्गावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातामुळे चारचाकींचा प्रवेश बंद करण्यात आला. तसेच पर्वरीवासीयांचे निर्गमन मार्गही बंद करण्यात आले. त्यामुळे पर्वरीवासीयांना नव्या पुलावरून तसेच अटल सेतूवरून ये-जा करताना अडचणी येत आहेत.
खंवटे म्हणाले की, पूल नवीन असल्याने वाहन चालविताना कोणती काळजी घ्यावी आणि लेनची शिस्त कशी पाळावी, याबाबत जनजागृती करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. अपघातानंतर पूर्ण वाहतूक बंद करण्याऐवजी अपघाताचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे होते.
पूल बंद करून वाहतूक खालच्या मार्गावर वळविल्याने परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाली आहे. म्हापशाहून पुलावर येणे सोपे असले तरी अटल सेतूच्या मुखाकडे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तेथून शहरात येणे तसेच शहरातून अटल सेतूकडे जाने कठीण झाले आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पुलावरील निर्बंधांचा आढावा घेऊन पर्वरीवासीयांना सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी शनिवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसामुळे पुलावर पाणी साचले. याबाबत मंत्री खंवटे म्हणाले की, पाणी साचण्याची समस्या सोडविणे आवश्यक आहे.
पाणी बाहेर काढणे हा अभियांत्रिकीचा छोटा मुद्दा असला तरी मार्ग बंद करताना त्याचा निचरा कसा होईल, याचा विचार करणे आवश्यक होते. नव्या उड्डाणपुलाबरोबरच अटल सेतूवरूनही पर्वरीवासीयांना प्रवेश मिळावा, यासाठी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
एका अपघातामुळे पुलावरून बाहेर जाता येत नाही आणि शहरातून आतही येता येत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पर्यटन हंगामात वाहतूक कशी नियंत्रित करणार, असा सवाल मंत्री यांनी केला. नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच निजो मॅजेस्टिक परिसरातील वाहतुकीची समस्या सोडविणे गरजेचे आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्र्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्वरीचा उड्डाणपूल पर्वरीकरांसाठी आहे की उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी आहे, असा प्रश्न पर्वरीवासीयांच्या वतीने विकास प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत विचारला. स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असेही प्रभुदेसाई म्हणाले. यावेळी पर्वरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पेडणेकर, महिला अध्यक्ष आणि युवा अध्यक्षांसह पर्वरीवासी उपस्थित होते. प्रभुदेसाई यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन घाईघाईत कुठलीही सुरक्षा उपाय न योजता, पुलाची तांत्रिक तपासणी न करता करण्यात आल्याचे सांगून सरकारला एक महिन्याची मुदत दिली.
या काळात सरकारने उड्डाणपुलावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक (रंबलर्स) बसवावेत, तांत्रिक दोष शोधावेत, ते दूर करावेत, वेग मर्यादा ५० कि.मी. प्रतितास ठेवावी, वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास ५ हजार रु. दंड आकारावा. सरकारने ही कामे ३० दिवसांत करावी; अन्यथा त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असेही प्रभुदेसाई म्हणाले. यावेळी त्यांनी खंवटे यांचे दोन व्हिडिओ दाखवले.
खंवटे यांनी एका भाषणात पर्वरी उड्डाणपूल मुंबई-कन्याकुमारी या इकॉनॉमी कॉरिडॉरचा भाग असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ हा पूल पर्वरीवासीयांसाठी नाही, तर सिंधुदुर्गात उद्योगपती गौतम अदानी यांचा एक प्रकल्प येत आहे, त्यासाठी बांधला गेला आहे, असा आरोपही प्रभुदेसाई यांनी भाषणाचा व्हिडिओ दाखवून केला. स्वप्न होते. मग त्यांना विश्वासात न घेता त्याचे उद्घाटन झालेच कसे? ते स्थानिक आमदार आहेत, त्यांनी पुलाचे डिझाइन, पुलाचे सुरू असलेले काम पाहून तांत्रिक माहिती मिळवायला हवी होती, असेही ते म्हणाले.