पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत चर्चा सुरू करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पाठवलेल्या प्रस्तावाचे रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीने (आरजीपी) स्वागत केले आहे. गोवा आणि गोमंतकीयांच्या व्यापक हिताचा विचार करून सकारात्मक चर्चेसाठी आरजीपी तयार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड पक्षाकडून आघाडीच्या चर्चेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसने आरजीपीसाठी चर्चेची दारे खुली केली आहेत. अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्य गोमंतकीयांनी गोव्याची जमीन, अस्मिता, संस्कृती, पर्यावरण, परंपरा आणि जीवनपद्धतीच्या संरक्षणासाठी एकजुटीने संघर्ष केला आहे. गोव्याच्या भवितव्याला धोका निर्माण झाल्यानंतर गावांपासून शहरांपर्यंत गोमंतकीयांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे.
ते म्हणाले, गोवा एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा आहे. हा प्रश्न केवळ निवडणुकीचा किंवा राजकीय समीकरणांचा नाही, तर भावी पिढ्यांसाठी आपण कोणता गोवा सोडून जाणार आहोत.
ते म्हणाले की, गोव्याच्या संरक्षणावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणाऱ्या राजकीय शक्ती एकत्र आल्या, त्यांनी जनतेच्या आकांक्षा समजून घेतल्या आणि राजकीय हितापेक्षा गोव्याच्या हिताला प्राधान्य दिले, तर विश्वासार्ह आणि एकसंध राजकीय पर्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो मूळ गोमंतकीयांना नवी आशा मिळू शकते. काँग्रेसकडून आलेल्या प्रस्तावानंतर सकारात्मक, विधायक संवाद होईल, अशी अपेक्षा आरजीपीने व्यक्त केली आहे.