RGP Leadership Crisis Ahead of Goa Assembly Elections
पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) मध्ये सध्या नेतृत्वाच्या प्रश्नावरून अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समिती (सीईसी) सदस्यांची आमदार वीरेश बोरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना पक्षाकडे कायमस्वरूपी अध्यक्ष नसणे, ही चिंतेची बाब असल्याचे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे.
बैठकीत पक्षाचे खजिनदार अजय खोलकर आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यात काही मुद्द्यांवरून तीव्र शाब्दिक वाद झाले. मात्र, या संपूर्ण घडामोडींवर आमदार बोरकर यांनी कोणतीही ठोस राजकीय भूमिका किंवा सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पक्षाचे काही ज्येष्ठ समर्थक आणि कार्यकर्त्यांनी पक्षातील वाढत्या अंतर्गत संघर्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांविरोधात लढण्याऐवजी स्वतःच्याच नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होत आहे, असे मत काही निष्ठावान समर्थकांनी व्यक्त केले.
मतदारांमध्ये संभ्रम...
२०२७ मध्ये मत द्यायचे की नाही? सध्याच्या परिस्थितीत आगामी निवडणुकांमध्ये आरजीपीला पाठिंबा द्यावा की नाही, याबाबत मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाकडे स्पष्ट दिशा आणि नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. अंतर्गत प्रश्न वेळेत सोडवले नाहीत, तर पक्षाचे भवितव्य कठीण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया काही मतदारांनी दिली. आमदारांनीच पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे. दरम्यान, पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि समर्थक वीरेश बोरकर यांनीच पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे आणि अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणी करत आहेत. मात्र, अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय कार्यकारी समितीकडून सामूहिकरीत्या घेतला जाणार जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.