म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
जमिनींचे मोठ्या प्रमाणावर होणारे रूपांतर रोखण्यासाठी तसेच रूपांतर प्रक्रियेनंतर होणाऱ्या कथित भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी नगर नियोजन खात्याच्या कायद्यातील कलम ३९-अ रद्द करण्यात यावे, असा ठराव हळदोणे ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
सरपंच आश्विन डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत नेल्सन फिगरेडो यांनी हा ठराव मांडला. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जमीन रूपांतरणामुळे पर्यावरणावर परिणाम होत असून भ्रष्टाचारालाही खतपाणी मिळत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे संबंधित कलम रद्द करून रूपांतर प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामसभेने हा ठराव एकमताने मंजूर केला. यावेळी शेत तळी व इतर जलस्रोतांचे संरक्षण करण्यात यावे. जलस्रोतांचे सर्वेक्षण करून त्यांचे संवर्धन करावे, तसेच विहिरीतील पाण्याचा बांधकाम किंवा व्यावसायिक वापर मर्यादित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
कॉस्मी फर्नांडिस यांनी हा विषय उपस्थित केला. पंचायतीकडून नव्या बोअरवेलना परवानगी देण्यात आलेली नसल्याची माहिती सरपंचांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी पंचायत सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यासही ग्रामसभेने मंजुरी दिली. या समितीत पंचसदस्यांसह ग्रामस्थांचाही समावेश करण्यात आला.
पंचायत क्षेत्रातील जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात यावे. वापरामध्ये असलेल्या घरगुती विहिरीतील पाण्याचा बांधकाम तसेच इतर व्यावसायिक वापरासाठी करण्यावर मर्यादा लागू करण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, पंचायतीकडून बोअरवेल्स बांधण्यात परवानगी दिली नसल्याचे सरपंचांनी या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान माहिती देऊन सांगितले. कॉस्मी फर्नांडिस यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
या ग्रामसभेत अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. पंचायत निधीतून दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन सरपंच आश्विन डिसोझा यांनी दिले. गाळवार येथील ३ बसशेडच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जोझफ सिक्वेरा यांनी मांडला.
पंचायत निधीतून बसशेडची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. या ग्रामसभेला गटविकास अधिकाऱ्यांचे निरीक्षक म्हणून भानुदास नाईक उपस्थित होते.