पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील प्रमुख रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांची बहुतांश कामे पूर्ण झाली असून मडगावमधील सर्व रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उच्चाधिकार समितीच्या परवानगीविना यापुढे रस्त्यांचे खोदकाम केल्यास पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल, असा इशारा बांधकामंत्री दिगंबर कामत यांनी दिला
राज्यातील रस्त्यांच्या कामांसंदर्भात तसेच सुरू असलेल्या खोदकामाबाबत बोलताना मंत्री कामत म्हणाले की, विविध विकासकामांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना होत असलेला त्रास रस्त्यांची डागडुजी झाल्याने आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बाधणी करण्यासाठी सरकारने व्यापक मोहीम राबवली. त्यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते प्रकल्प पूर्णत्वास गेले असून राज्यातील रस्ते नेटवर्कची गुणवत्ता आणि संपर्क व्यवस्था अधिक सुधारली असल्याचे ते म्हणाले.