Electricity Supply in margao
Electricity Supply File Photo
गोवा

Electricity Supply | वीज पुरवठा गेले तीन दिवस खंडीत; तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा
मडगाव पुढारी वृत्तसेवा

वीज पुरवठा गेले तीन दिवस खंडीत असल्याने संतप्त झालेल्या काजूर आणी कावरे येथील शेकडो ग्रामस्थांनी कुयणामळ केवण येथील वीज उपकेंद्रावर धडक मोर्चा गेला होता. दरम्यान, केवण येथे गुरुवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. एकीकडे लोकांचा संयम तुटत चालला होता तर दुसरीकडे त्याची पर्वा नसल्या प्रमाणे वीज अभियंते फोन वर आपल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने विधानसभा अधिवेशनात असलेले समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रातोरात घटनास्थळी दाखल होऊन बेजबाबदार अभियंत्यांचा पायउतारा केला.

सविस्तर माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून रिवण आणि कावरे पिर्ला या गावात वीज पुरवठा खंडित आहे.लोकांनी कित्येक वेळा वीज कार्यालयाशी संपर्क साधून खंडीत वीजपुरवठया प्रकरणी तक्रार दिली होती. गुरुवारी सायंकाळ पर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी रात्री उशीरा उपकेंद्रावर धडक मोर्चा काढला.

शेकडो लोक चाल करून येणार याची कल्पना नसलेले वीज कर्मचारी निवांत बसून होते. शेकडोच्या संख्येने आलेल्या जमावाने उपकेंद्रावर धडक देताच कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. लोकांनी वीज उपकेंद्राच्या दारावर ठिय्या मारल्यामुळे आतील कर्मचारयांना बाहेर पडता आले नाही.

तीन दिवस वीज पुरवठा खंडीत आहे अश्या परिस्थिती बायका मुलांनी काय करायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत त्यांच्यावर प्रशांची सरबत्ती करण्यात आली. घरातील विद्युत उपकरणे बंद आहेत. अन्नाची नासाडी होत आहे. मोबाईल चार्ज करता येत नाही. खंडीत वीजपुरवठयाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे असे सांगून वीज कर्मचाऱ्यांचा पायउतारा करण्यात आला.

लहांन मुले आणि आजारी व्यक्तींचे हाल झाल्याचे नागरीकांनी सांगितले. मोर्चात महिलांनीही सहभाग घेतला होता. लोकांनी स्थानिक लोकप्रतिनिधीवरही आपला राग व्यक्त केला.सुमारे तीन तास या कार्यालयाबाहेर जमलेला जमाव हलला नव्हता.

वीज पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यत येथून हलणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली होती.वातावरण गंभीर होत चाललेले असतांना कार्यकारी अभियंत्यांनी घटनास्थळी येऊन लोकांशी संवाद साधण्याचे टाळले होते.

वीज पुरवठया विषयी ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतापलेल्या जमावाने आक्रमक भूमिका घेत तीन तासांचा अल्टीमेटम देऊन तीन तासांच्या आत गावात वीज न आल्यास कायदा आणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा दिला.

दरम्यान विधानसभा अधिवेशनात व्यस्त असलेल्या सुभाष फळदेसाई यांनी रातोरात कुयणामळच्या उपविज केंद्राकडे धाव घेतली. लोकांशी चर्चा करुन त्यांनी तिथूनच कार्यकारी अभियंत्यांना फोन करुन त्यांना फैलावर घेतले. वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी उपाययोजना अखण्याविषयी तूम्हाला सतर्क करण्यात आले होते तरिही तीन दिवस लोकांना अंधारात रहावे लागल्या बद्धल त्यांनी अभियंत्याना धारेवर धरले.

मी विधानसभा अधिवेशन सोडुन येऊ शकतो पण तुम्ही इथे पोहोचू शकत नाहीत. तुम्ही वीज खात्यासाठी काम करत आहात याची आठवण ठेवा. कॅमेरे दिसताच तुम्ही धावून जाता. एका घराला वीज पुरवठा करण्यासाठी तुम्ही धावून जंगलात पोहोचलात पण तीन दिवस एक हजार लोक अंधारात आहेत त्याचे तुम्हाला काहीच पडुन गेलेले नाही. काहीही करा पण त्या गावानां वीज मिळालीच पाहिजे अश्या शब्दात मंत्री फळदेसाई यांनी अभियंत्यांना ताकीद दिली आहे.

SCROLL FOR NEXT