पेडणे : पुढारी वृत्तसेवा
तांबोसे-उगवे नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या करारानुसार २ जून रोजी काढण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अद्याप जात आहे. समाधानकारक पाऊस झालेला नसतानाच फळ्या काढण्यात आल्याने नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होण्याची शक्यता व्यक्त केली. स्थानिकांच्या मते, या बंधाऱ्यात साठवले जाणारे पाणी परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
बंधाऱ्याच्या फळ्या काढल्यानंतर नदीतील पाणी वाहून जात असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरणे कठीण होऊ शकते. परिणामी, येत्या काही दिवसांत पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तांबोसे, उगवे आणि परिसरातील अनेक गावे या जलस्रोतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला बंधाऱ्याच्या फळ्या काढण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, यंदा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसताना फळ्या काढण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत निर्णय घेणे आवश्यक होते; अन्यथा नदीतील पाणीसाठा कमी झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
पाऊस नसताना एवढी घाई का ?
अद्याप पावसाची जोरदार सुरुवात झालेली नसताना बंधाऱ्याच्या फळ्या काढण्याची एवढी घाई का करण्यात आली, असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तांबोसे-उगवे बंधाऱ्यावरील या निर्णयामुळे येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता असून प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
तत्काळ उपाययोजना करा
नागरिकांनी प्रशासन, जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून परिस्थितीचा आढावा घ्यावा तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.