पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
पणजीतील मळा, नेवगीनगर ते भाटले राम मंदिरापर्यंत पणजीतील आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्कूटरवरून किंवा दुचाकीवरून फिरावे म्हणजे कशी हालत होते द्याकीस्वारांची हे त्यांना समजेल.
गेल्या दोन वर्षांपूर्वी मळा पाटो पूल बांधण्यात आला होता. या जोडपुलामुळे भाटले, ताळगाव येथे जाणाऱ्या नागरिकांची उत्तम सोय झाली. सहा महिन्यांपूर्वी भाटलेतील राम मंदिरापर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला होता.
प्रसार माध्यमात याबद्दल वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली होती. दोन महिन्यांपूर्वी नेवगी नगर ते राममंदिरापर्यंत पेव्हर्स बसवण्यात आले. परंतु आता ते पेव्हर्स उचलून वर आले आहेत तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. पाटो-मळा जोडपूल झाल्यामुळे भाटले, ताळगाव भागातीलवाहनचालक भाटलेमार्गे ताळगाव, टॉक भागात जात येत असतात.
मेरशी, कालापूर, पर्वरीमार्गे येणारे वाहनचालक ताळगाव येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. परंतु नेहमी जाणाऱ्या वाहन चालकांची वाहने खिळखिळी होतात असे त्रस्त नागरिकांनी सांगितले
दररोजचा प्रवास; कंबरदुखी वाढली
दररोज दुचाकीवरून जाणाऱ्याचे कंबरदुखीसारखे आजार वाढले आहेत. यासंबंधी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही. पेव्हर्स बसवण्यापेक्षा रस्त्याचे डांबरीकरण केले असते तर वाहनचालकांना होणारा त्रास वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक करीत आहेत.