पणजी : पणजीत नारळाचे दर ७० रुपयांवर पोचले आहेत. एरवी २० ते ३० रुपयांना मिळणारा नारळ आता ४० ते ७० रुपयांना मिळत आहे. नारळाचा तुटवडा असल्याने दर वाढल्याचे विक्रेते सांगत असले, तरी फलोत्पादन महामंडळाचे संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी गोव्यात नारळांची कमतरता नसल्याचे व भाव स्थिर असल्याचे म्हटले आहे.
नारळाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्या वाजवी राहण्यासाठी सरकार उपाययोजना करेल, असे नाईक देसाई म्हणाले. तथापि, पणजी बाजारात लहान नारळ प्रत्येकी ४० रुपयांना, मध्यम आकाराचा ५० रु., तर मोठे नारळ प्रत्येकी ६० ते ७० रुपयांना विकले गेले. नाईक देसाई यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात उत्तर गोव्यात भाजीपाल्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढते, त्यामुळे राज्याला बेळगावी आणि कोल्हापूरमधून नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट भाजीपाला खरेदी करावा लागतो.
गोव्यामध्ये ३७ वितरण केंद्रे असून, ६० टक्के भाजीपाला शेजारील राज्यांमधून आणि ४० टक्के स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन खरेदी करणे नेहमीच फायदेशीर नसले, तरीही सरकार त्यांना पाठिंबा देत आहे.