पणजी : राज्यात पावसाचा वेग मंदावला असून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मात्र, पावसाचा मंदावलेला वेग चिंताजनक असून एरवी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस असतो. यंदा मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील धरणात पुरेसा जलसाठा जमा झालेला नाही. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. यामुळे मान्सूनची तूट २६.७ पर्यंत वाढली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत आणि जुलै महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणांमधील पाण्याची पातळी काहीशी वाढली होती. शेतकरीही आनंदी झाले होते.
आकडेवारीनुसार, गेल्या पाच दिवसांत केवळ १२६.३ मिमी पाऊस झाला असून, ५ जुलै रोजी सर्वाधिक ४०.०५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे, तर एकूण ८९८.६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली. जूनमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त झालेली तूट या महिन्यातही कमी पावसामुळे कायम आहे. जुलै महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक पर्जन्यवृष्टी केवळ ६४.९ मिमी होती, जी १ जुलै रोजी नोंदवली गेली.