बांदा : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधुदुर्गातील एका कुटुंबाला स्थानिक युवकांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यानंतर संतप्त झालेल्या संबंधित कुटुंबीयांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी-बांदा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.
मालवण तालुक्यातील सूरज परब हे कुटुंबासह गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. पर्यटन आटोपून ते आपल्या कारने परत घरी येत असताना गोवा-मांद्रे परिसरात दारूच्या नशेत असलेल्या काही दुचाकीस्वारांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली. या घटनेनंतर सूरज परब यांनी संबंधित युवकांना जाब विचारला असता वाद निर्माण झाला.
वाद वाढल्यानंतर संबंधित युवकांनी आपल्या अन्य साथीदारांना घटनास्थळी बोलावले. काही वेळातच ३० ते ४० युवकांचा जमाव तेथे जमा झाला. त्यांनी सूरज परब, त्यांचा भाऊ तसेच कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिलांसह लहान मुलेही घाबरून गेली होती.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सूरज परब यांनी तात्काळ '११२' या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकांच्या बाजूने भूमिक घेतल्याचा आरोप परब कुटुंबीयांन केला आहे.
"हे स्थानिक लोक आहेत, तुम्ही तक्रार दिल्यास तुम्हालाच त्रास होईल, त्यामुळे तक्रार देऊ नका," असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचा दावा सूरज परब् यांनी केला आहे. सोमवारी सायं. ४ वा च्या सुमारास सूरज परब आणि त्यांच्य समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गावन रास्ता रोको आंदोलन सुरू केले.