वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यात बिबट्यांच्या लोकवस्तीतील वावरामुळे वाढत चाललेल्या मानव-वन्यजीव संघर्षाचा आणखी एक दुर्दैवी बळी गेला आहे. चरावणे परिसरातील यशवंत गोपाळ गावस (वय ५८) यांच्यावर शुक्रवारी बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
मानव-वन्यजीव यशवंत गावस गावस हे गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस खात्यात वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलिस खात्यासह चरावणे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत गावस हे शुक्रवारी ठाणे येथून आपल्या मूळगावी चरावणे येथे दुचाकीने येत होते. चरावणे रस्त्यावर अचानक जंगलातून बिबट्याने झेप घेत त्यांच्यावर हा हल्ला केला. यात ते रस्त्यावर पडले व डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
या हल्ल्यात त्यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. मंगळवारी दुपारी त्यांचे पार्थिव चरावणे येथील निवासस्थानी आणण्यात आले. ग्रामस्थ, नातेवाईक, पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर चरावणे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकवस्तीत बिबट्यांचा वाढता वावर
गेल्या काही वर्षांत सत्तरी तालुक्यात बिबट्यांचे लोकवस्तीत येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. जंगलात खाद्याची कमतरता भासू लागल्याने ते कुत्रे, मांजरे व लहान जनावरांवर हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीतही बिबट्यांचे दर्शन होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.