मडगाव : गोव्यातील कदंब परिवहन मंडळ (केटीसी) यांच्या स्थानिक बससेवेतील अनियमितता आणि नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पणजी-मडगाव मार्गावरील बस दर पाच मिनिटांनी सुटत असल्याचे अधिकृत वेळापत्रकात नमूद असले, तरी प्रत्यक्षात सेवा पूर्णपणे विस्कळीत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याची माहिती नावेली येथील ज्यो परेरा यांनी दिली.
परेरा यांच्या म्हणण्यानुसार, २७फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता पणजी येथील केटीसी स्थानिक बसस्थानकावर मडगावकडे जाण्यासाठी प्रवासी प्रतीक्षेत होते. मात्र, तब्बल २५ मिनिटे एकही बस उपलब्ध नव्हती. अखेर १२.३१ वाजता एक बस आली; परंतु ती १२.४० वाजता सुटणार असल्याचे सांगण्यात आले. अधिकृत वेळापत्रक आणि प्रत्यक्ष सेवा यामधील तफावत पाहता प्रवाशांचा संताप वाढत आहे.
नियंत्रण कक्षाकडे चौकशी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्याच दिवशी दुपारी २.३० वाजल्यापासून कुंकळी येथे मडगावकडे जाणाऱ्या बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. २.४७ वाजता आलेली बस पूर्णपणे भरलेली होती.
त्यानंतर सुमारे ३.१० वाजता दोन बस आल्या; मात्र त्या देखील खचाखच भरलेल्या असल्याने थांब्यावर उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनाही बसमध्ये चढता आले नाही. काही बस थांब्यापासून दूर उभ्या राहत असल्याने प्रवाशांना बस पकडणे कठीण झाले. अखेर सुमारे ३.३५ वाजता प्रवाशांना बस मिळाली. म्हणजेच सुमारे ७० मिनिटांच्या कालावधीत पणजीहून केवळ तीनच बस सुटल्याचे स्पष्ट झाले.
या अनियमिततेमुळे सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे परेरा यांनी नमूद केले. वेळापत्रकानुसार सेवा न चालवल्याने बस नेमक्या कुठे वळविल्या जातात, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बससेवा तातडीने नियमित करून प्रवाशांचा त्रास कमी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, कदंब परिवहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.