पणजी : पुढारी वृत्तसेवा
गैरकारभाराने भाजप गोव्याचे भविष्य उद्ध्वस्त करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे महासचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी केली. डॉ. राम मनोहर लोहिया गोव्याला मुक्त करण्यासाठी लढले. मात्र, आता गोव्यातील लोकांना गोव्याच्या अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे. गोव्यात भाजपविरोधी वातावरण असून २०२७मध्ये गोव्यातील लोकच भाजपला सत्तेवरून घालवणार आहेत.
दोनापावला येथे पत्रकार परिषदेत वेणुगोपाल बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष एम. के. शेख, आमदार एल्टन डिकॉस्ता व कार्लस फेरेरा, अमरनाथ पणजीकर, सुनील कवठणकर आदी उपस्थित होते. वेणुगोपाल म्हणाले की, भाजपने गोवा विकायला काढला आहे.
मोक्याच्या जमिनींचे बांधकामासाठी रूपांतर केले जात आहे. जमिनी लुबाडणे, जमिनीचे रूपांतरण करणे, भ्रष्टाचार करणे यात सरकार गुंतले आहे. भाजप सरकार गोव्याचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे भाजपच्या गैरकारभाराविरुद्ध लढण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही वेणुगोपाल म्हणाले. वेणुगोपाल म्हणाले, हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे.
ते बेरोजगारीच्या समस्येकडे लक्ष देत नाही. गेल्या चार वर्षांत १२७ हत्या, ३८३ बलात्कार, चोरी, घरफोडी आणि दरोड्याचे २,११३ गुन्हे, ३५४ अपहरण आणि हल्ल्याचे १,१२७गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे धक्कादायक आहे. गोव्याच्या संरक्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रदेश काँग्रेसला पूर्ण पाठिंबा मिळेल. आपण राजकारणासाठी धर्माचा वापर करू नये; पण, भाजप हेच करून लोकांमध्ये फूट पाडत आहे. ते मंदिरांची लूटमारही करत आहेत. गरीब भक्तांनी दिलेली देणगी लुटत आहेत
तेव्हा गझनी, आता भाजपवाले
भाजप नेहमी महम्मद गझनीने सोमनाथ मंदिर लुटल्याचे सांगते. पण, आता भाजपवाल्यांनीच अयोध्येतील राम मंदिर लुटले आहे. भाजप आणि पंतप्रधान या लुटीच्या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा प्रश्नही वेणुगोपाल यांनी विचारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निष्पक्ष चौकशी करावी व खऱ्या गुन्हेगारांना अटक करावी आणि सध्या कार्यरत देवस्थान कमिटी बरखास्त करावी, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, मला अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही, असेही वेणुगोपाल म्हणाले.
चोडणकर प्रामाणिक, आरोप नको
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षनेते राहुल गांधी हे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना ओळखतात. चोडणकर अनेक वर्षे पक्षासोबत आहेत. त्यामुळे ते किती प्रामाणिक आहेत, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप खोटा असून मी तो खोडून काढत आहे. आरोप काय कुणीही कुणावरही करू शकतो, त्यामुळे यावर चर्चा नको, असे उत्तर वेणुगोपाल यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिले.