दिवाडी : गोव्याने ९ ते १० राजेशाही पाहिल्या आहेत. त्यातील १० ते १४ वे शतक हा सुवर्णकाळ होता. याच काळात कदंब राजांनी येथे मोठमोठी मंदिरे उभारली. पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली एक हजार मंदिरे कदंब काळात बांधली गेली होती. पोर्तुगीजांनी येथे येऊन मंदिरे नष्ट केली नसती, तर दक्षिण भारतातील मंदिरांपेक्षा भव्य मंदिरे येथे असती आणि आम्ही त्यांचे वारस असतो. त्यामुळे विकसित गोवा २०३७ चे ध्येय गाठताना सुवर्णकाळ असलेला कदंबकालीन इतिहास लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी (दि. ४) दिवाडी येथे केले.
कोटीतीर्थ कोरिडोर विकास प्रकल्पांतर्गत श्री सप्तकोटेश्वर कोटीतीर्थ जीर्णोद्धार समितीच्या वतीने दिवाडी येथे मंदिर जीर्णोद्धाराची सुरुवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते उदकशांती आणि गंगापूजनाने करण्यात आली. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद तानावडे, आमदार राजेश फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पुरातत्त्व खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक नीलेश फळदेसाई, प्रा. मधुकर दीक्षित आणि दिवाडी बेटावरील विविध मंदिर समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. तुळशी वृंदावनास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या सोहळ्यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार जीत आरोलकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, गोवा संघचालक राजन भोबे, प्रदेश भाजप उपाध्यक्ष दत्ता खोलकर, गोलती नावेली सरपंच मारियो पिंटो, मार्टिना वाज, खोर्ली जि. पं. सदस्य सिद्धेश नाईक यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.