पणजी : पुढारी वृत्तसेवा
अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा फटका आखाती देशांनाही बसत आहे. या देशांत असलेले गोमंतकीय सध्या सुखरुप असून कोणताही धोका नाही. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या आखातातील दूतावासांनी केले आहे. दरम्यान, सोमवारी व मंगळवारी १ मिळून अशी दाबोळी विमानतळावरून दुबई व बहरिनकडे जाणारी तीन विमाने रद्द करण्यात आली आहेत.
२ नोकरीनिमित्त व आखातात अभ्यासक्रमासाठी असलेल्या गोमंतकीयांच्या संपर्कात भारताचे राजदूत आहेत. एनआरआय कार्यालय या लोकांच्या मदतीसाठी खुले असून भारतीय राजदूतांशीही संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती गोव्यातील अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून कुवेत, दुबई तसेच यूएई या आखाती देशांत असलेल्या गोमंतकीयांना या युद्धामुळे धोका निर्माण झाल्याने गोव्यातील त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. त्यांच्या गोव्यातील कुटुंबीयांनी या कार्यालयाशी संपर्क साधला तसेच मलाही काहींनी थेट फोन केले.
भारत सरकारने आखातातील भारतीय नागरिकांसाठी प्रवास व सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारतीय दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत व मार्गदर्शन करत आहेत, असे अॅड. सावईकर म्हणाले. इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, अनावश्यक हालचाली टाळण्याचा व शक्यतो घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीयांनी बातम्यांचे निरीक्षण करावे, परिस्थितीजन्य जागरूकता राखणे व भारतीय दूतावासांकडून पुढील मार्गदर्शनाची वाट पाहावी. कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कुवेत यासारख्या आखाती देशांमधील भारतीय दूतावासांनी तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
अबूधाबीमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, योग्य काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विमाने रद्द झाल्याने प्रवासी अडकले...: विमानांची उड्डाणे अचानक रद्द झाल्याने दुबई व बाहयिनकडे जाणारे तसेच तिथून गोव्याला येणारे प्रवासी अडकले आहेत.
अनेक प्रवासी विमानतळावर पोहोचल्यावर उड्डाण रद्द झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली. विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही उपाय योजना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. प्रवाशांनी अधिकृत स्त्रोतांवरून माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास नको : अॅड. फेरेरा
इस्त्राईल व अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वकडे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे वास्तव्यास असलेल्या गोमंतकीय नागरिकांनी शांतता राखावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांनी केले आहे.
नातेवाईक चिंतेत...
गोव्यातील अनेकजण आखातात नोकरी व व्यवसाया निमित्त गेले आहेत. विशेषतः दक्षिण गोव्यातील अनेकजण आखातातील जहाजांवर नोकरीला आहेत. सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे गोव्यातील त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे.
गोवा एनआरआय कार्यालय उपलब्ध :
अॅड. सावईकर सध्या इराणमधील स्थिती सर्वसाधारण असून कोणताही मोठा धोका निर्माण झालेला नाही. जे कोणी गोमंतकीय प्रवासात अडकले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी गोवा एनआरआय कार्यालय उपलब्ध आहे. त्यामुळे कोणी चिंता करण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारही आखाती देशात असलेल्या भारतीयांवर नजर ठेवून आहे, असे अॅड. नरेंद्र सावईकर म्हणाले.