हरमल : पुढारी वृत्तसेवा
येथील तुर्किणी आगरानजीकची लागवडीयोग्य शेतजमीन संबंधित खात्याच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे पडीक पडली असून, सुजलाम-सुफलाम जमीन वाया जात आहे. या प्रश्नावर शेतकी खात्याचे अधिकारी तातडीने उपाययोजना करणार का, असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील शेतकी खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यानंतर तुर्किणी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
या भागातील आठ ते दहा शेतकरी दुबार शेती करून भरघोस उत्पादन घेत होते. हळसंदे, भुईमूग, मिरची आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असे. मात्र जिल्हाधिकारी, मामलेदार तसेच बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेळेत लक्ष न दिल्याने ही सुपीक शेतजमीन पडीक पडली असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे एका शेतकऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
शेतात साचणारे पाणी गटार आणि साकवामार्गे जुनसनदीत सोडण्याची व्यवस्था सहज करता येऊ शकते. याबाबत शेतकऱ्यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्याने शेतजमीन लागवडीखाली आणता आलेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
आमदार आरोलकरांकडून पाहणी पण...
दरम्यान, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत शेतजमिनीची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन केले होते. मात्र, त्यानंतरही प्रश्नावर ठोस तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, पडीक पडलेली सुपीक शेतजमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.