पणजी: पुढारी वृत्तसेवा: गोवा आणि महाराष्ट्राचे संयुक्त धरण असलेल्या 'तिलारी ' धरणातून अखेर सोमवारी (दि. १५) पहाटे साडेतीन वाजता विसर्ग सुरू करण्यात आला. खळग्यातील धरणातून सायंकाळी ५ वाजता प्रतिसेकंद ४६.३८० घ.मी.पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात आले.
तिलारी धरण ८० टक्के भरले
प्रतिसेकंद ४६.३८० घ.मी. पाणी तिलारी नदीत
२४ तासांत पाण्याच्या पातळीत ५ टक्क्यांनी वाढ
यावेळी सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी धरणावर जलपूजन केले. यावेळी उपविभागीय अभियंता गजानन बुचडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. गोव्याला पाणीपुरवठा करणारे तिलारी धरण सध्या ८०.१८ टक्के भरले आहे. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात १२५.४ मिमी पाऊस पडला. गेल्या २४ तासांत धरणातील पाण्याची पातळी ५ टक्क्याने वाढली. सध्या धरणात ३५८.६९९ द. ल. घ. मी. एवढा पाणीसाठा आहे. खळग्यातील धरणाच्या सांडव्यावरून प्रतिसेकंद ४६.३८० घ. मी. पाणी पुच्छ कालव्यातून तिलारी नदीत सोडण्यात येत आहे.