पणजी : पुढारी वृत्तसेवा
म्हादई पाण्याच्या प्रश्नाबाबत आतापर्यंत गोवा सरकार कायदेशीर लढाई लढत आले आहे. त्यामुळे कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयात कोणाला व काय विनंती केली आहे त्यावर काही बोलायचे नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढून म्हादईबाबत गोव्याचा विजय नक्की आहे असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करून म्हादईसंदर्भाची याचिका गोवा सरकारने मागे घ्यावी, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात सरकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. ते म्हणाले, म्हादई प्रश्न राज्याचे महाधिवक्ता तसेच त्यांची कायदा टीम काम पाहत आहे.
सर्वोच्च न्यायालय व म्हादई लवाद येथील प्रकरणे ही कायद्याशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यावर अधिक काही बोलायचे नाही. म्हादईबाबत सरकार ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. हे प्रकरण केंद्र सरकार तसेच म्हादई लवादाशी संबंधित आहे. हा म्हादईचा लढा अधिक कायदेशीर तज्ज्ञांचा वापर करून लढला आहे व यापुढेही तो लढला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.