वाळपई : पुढारी वृत्तसेवा
मान्सून राज्यात दाखल झाला असून सत्तरी तालुक्यातील सर्व नद्यांवर उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या फळ्या पूर्णपणे काढण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी बंधाऱ्यांच्या खांबांमध्ये अडकलेली लाकडे काढण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यानुसार सर्व ठिकाणी आवश्यक ती कामे पूर्ण करण्यात आली असून निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. तसेच काही बंधाऱ्यांच्या खांबांमध्ये साचलेला गाळही साफ करण्यात आला आहे.
यामुळे पावसाळ्यात नद्यांच्या प्रवाहाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याची माहिती जलसिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. सत्तरी तालुक्यातील अनेक नद्यांवर जलसिंचन खात्याने बंधारे उभारले आहेत. "पाणी अडवा, पाणी जिरवा" या योजनेअंतर्गत विविध ठिकाणी बंधारे बांधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करण्यात येतो.
हा साठवलेला पाणीसाठा तालुक्यातील शेती व बागायतींसाठी वापरण्यात येतो. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर लगेच बंधाऱ्यांच्या फळ्या बसवून पाणी अडविण्यात येते. बंधाऱ्यांच्या जलाशयामध्ये साचलेले पाणी उपसा सिंचन योजनांद्वारे शेतकरी बांधवांच्या शेतांपर्यंत पोहोचविले जाते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात सत्तरी तालुक्यातील सर्व नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो. अशा वेळी नदीपात्रात छोटासा अडथळा निर्माण झाला तरी काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
मात्र बंधाऱ्यांवरील सर्व अडथळे दूर करण्यात आल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी जलसिंचन खात्याने विशेष खबरदारी घेतली आहे. बंधाऱ्यांच्या खांबांमध्ये अडकलेली लाकडे पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहेत. ही लाकडे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करून पूरसदृश परिस्थिती निर्माण करू शकत होती. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांकडून ती तातडीने हटविण्यात आली. बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याबरोबरच इतर अडथळेही दूर करण्यात आले आहेत.
गाळ उपसा कामही पूर्ण...
काही बंधाऱ्यांच्या खांबांमध्ये व परिसरात गाळ साचला होता. हा गाळ पाण्याच्या प्रवाहासाठी अडथळा ठरू नये, यासाठी तोही आवश्यक त्या प्रमाणात उपसण्यात आला आहे. पावसाळ्यात नद्यांचा प्रवाह सुरळीत राहावा आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही सर्व पूर्वतयारी करण्यात आल्याची माहिती जलसिंचन खात्याकडून देण्यात आली.