पणजी : पुढारी वृत्तसेवा
हवामान खात्याच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील "अल निनो" वातावरणीय प्रणालीच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनची तीव्रता कमी राहिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत अपेक्षेइतका पाऊस पडलेला नाही आणि धरणांमध्ये पाण्याची आवकही मर्यादित राहिली आहे. सद्यस्थितीत अंजुणे धरणात सर्वात कमी म्हणजे केवळ ११ टक्के पाणीसाठा आहे. सर्वाधिक पाणीसाठा आमठाणे धरणात (५२ टक्के) आहे.
राज्यात ५ जून रोजी मान्सून दाखल झाला. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ४५ टक्क्यांनी कमी असल्याने धरण क्षेत्रासह राज्यातील विविध भागांमध्ये पाण्याची आवक घटली आहे.
परिणामी, मागील आठ दिवसांत राज्यातील सहापैकी चार प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून अखेरीस अंजुणे धरणात १३.८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ११ जूनअखेरीस तो घटून ११ टक्क्यांवर आला. दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणातील पाणीसाठा २९.३ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
पंचवाडी धरणातील पाणीसाठाही २३ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आमठाणे धरणात सध्या सर्वाधिक ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असला, तरी आठ दिवसांपूर्वी तो ५४ टक्के होता. तिलारी धरणातील पाणीसाठाही ३२.३ टक्क्यांवरून २८.४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. दरम्यान, १ ते १३ जून या कालावधीत राज्यात काणकोण तालुक्यात सर्वाधिक १५.१९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
यामुळे चापोली धरणातील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली असून, ३ जून रोजी ४०.४ टक्के असलेला साठा ११ जून अखेरीस ४१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर गवाणे धरणात ३ जून आणि ११ जून या दोन्ही दिवशी समान म्हणजे ४४ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला. त्यामुळे काही धरणांमध्ये स्थिती स्थिर असली, तरी बहुतेक जलसाठ्यांमध्ये घट दिसून येत आहे.