पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात वेगाने वाढणारी वाहनांची संख्या ही हवा प्रदूषणासोबत राज्यातील गंभीर पर्यावरणीय धोका म्हणून उदयास येत आहे. २०२५ च्या पर्यावरण राज्य अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायू उत्सर्जन, वायू प्रदूषण आणि ऊर्जा वापराचे प्रमुख स्रोत बनले आहे.
यात तातडीने उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर वाढती वाहतूक आणि जीवाश्म इंधनावरील निर्भरता गोव्याच्या हवामान लवचिकता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय स्थिरतेला गंभीरपणे कमजोर करू शकते. अहवालानुसार, गोव्यात वाहन मालकीचे प्रमाण देशातील सर्वाधिक आहे.
येथे दर १००० लोकांमागे सुमारे ६५० वाहने आहेत. जी राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास तिप्पट आहे. ही असामान्यपणे जास्त घनता कमकुवत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यटन-चालित गतिशीलतेच्या गरजा आणि खासगी वाहनांना वाढती पसंती दर्शवते. त्यामुळे शहरी, किनारी आणि ग्रामीण भागात रस्ते वाहतूक वेगाने वाढली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, अलिकडच्या वर्षांत दरवर्षी ८० हजारांहून अधिक वाहनांची भर पडल्याने इंधन, रस्त्यांची मागणी थेट वाढली आहे. पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा सारख्या शहरी केंद्रांमध्ये वाहनांमधून होणारे उत्सर्जन हे कण, नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमुख स्रोत आहे.
वाहनांची वाढती घनता, गर्दी आणि स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर कमी झाल्यामुळे श्वसन आणि हृदयरोगांचे आजार वाढत असून आरोग्यसेवेचा वाढता खर्च आणि आवाजाशी संबंधित वाढत्या त्रासांसह पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम आधीच स्पष्ट आहेत. अहवालात वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या उल्लंघनांमध्ये तीव्र वाढ दिसून येते.
इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत वाढ...
गेल्या पाच वर्षांत ३० हजारांहून अधिक ईव्ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत हळूहळू वाढ होत असली तरी, ते अजूनही १४.०८ लाखांहून अधिक वाहनांच्या संख्येच्या तुलनेत नगण्यच आहे.