वाळपई : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांमधून येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पात कचरा आणला जात आहे. मात्र, हा कचरा कोणत्याही आच्छादनाशिवाय अत्यंत उघड्या पद्धतीने आणला जात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, नुकत्याच पार पडलेल्या पिसुर्ले ग्रामसभेमध्ये नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सदर कचरा प्रकल्प त्वरित बंद करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पिसुर्ले पंचायतीची ही ग्रामसभा सरपंच देवानंद परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला पंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला सचिवाने मागील ग्रामसभेचा इतिवृत्तांत सादर केल्यानंतर नियमित कामकाजाला सुरुवात झाली.
विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात औद्योगिक वसाहतीमधील कचऱ्याचा प्रश्न या सभेत सर्वाधिक गाजला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर सरपंचांनी या संदर्भात वस्तूस्थिती मांडून ग्रामस्थांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीमध्ये येणारी कचऱ्याची वाहने पूर्णपणे ताडपत्री किंवा आच्छादन घालून येणे गरजेचे आहे. मात्र, ही वाहने उघडीच येत असल्याने रस्त्याभर कचरा आणि दुर्गंधी पसरत आहे. यामुळे हवेचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
औद्योगिक वसाहतीच्या सभोवताली दाट लोकवस्ती असून अनेक घरे आहेत. या घाणीमुळे स्थानिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असून, दुर्गंधी थेट घरांमध्ये येत असल्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे पंचायतीने या संदर्भात तात्काळ आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली "या गंभीर परिस्थितीबाबत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
आमदार डॉ. देविया राणे यांनाही या समस्येची कल्पना देण्यात आली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचायतीच्या तक्रारीची अद्याप गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे सरपंचांनी सांगताच ग्रामस्थ अधिक संतानत झाले, पंचायत समस्या मांडण्याचे व्यासपीठ आहे. जर प्रदूषण महामंडळ दखल घेत नसेल, तर आपण सर्वांनी मिळून रस्त्यावर उतरावे लागेल, अशी आक्रमक भूमिका अनेकांनी मांडली.
दरम्यान, यावर बोलताना सरपंच देवानंद थोरात यांनी स्पष्ट केले की, हा प्रश्न खरोखरच गंभीर असून पंचायत याविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पावले उचलणार आहे. सदर कचरा प्रकल्पाला तात्काळ नवीन नोटीस बजावण्यात येईल. आमदारांसोबत चर्चा करून स्थानिकांना दिलासा देण्यासाठी कचरा प्रकल्प व्यवस्थापनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आमदारांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
आमदार डॉ. दिव्या राणे यांच्याकडे ही समस्या मांडूनही अद्याप हा प्रकार का बंद झालेला नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. हा प्रश्न आमदारांसमोर पुन्हा एकदा अत्यंत प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी नागरिकांनी केली. आमदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. येणाऱ्या काळात हा त्रास बंद झाला नाही, तर पंचायत प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने कचरा प्रकल्पाच्या विरोधात थेट आंदोलन पुकारावे, ज्यामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे जाहीर करण्यात आले.