वाळपई : पुढारी वृत्तसेवा
वाळपई शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका आता विद्यार्थी वर्गालाही बसू लागला आहे. मात्र, या समस्येवर उपाययोजना करण्याकडे संबंधित यंत्रणेकडून अद्याप दुर्लक्षच होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 'वाळपई शहराची वाहतूक कोंडी सोडवणार तरी कोण?' असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
विशेष म्हणजे, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि अनिशामक दलाची वाहनेही वारंवार वाहतूक कोंडीत अडकत असल्याने आपत्कालीन परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. त्यामुळे सरकारच्या संबंधित विभागाने आता तरी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून वाळपई नगरपालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सत्तरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाळपई शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. बेशिस्त वाहन पार्किंग आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. शहरातील अव्यवस्थित पार्किंगवर नियंत्रण मिळवले, तर वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे नागरिकांचे मत आहे. दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी अधिक तीव्र होत असून, सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
नगरपालिकेने विशेष लक्ष देऊन किमान बेशिस्त वाहन पार्किंगवर नियंत्रण आणले, तरी परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांकडून आहे. आरोपही करण्यात येत रुग्णवाहिका, अग्निशामक दलही कोंडीत अडकते वाळपई शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका आता १०८ रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशामक दलाच्या वाहनांनाही बसत आहे. अनेकदा ही वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याने आपत्कालीन ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत आहे.
वाळपई अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरगाव, ठाणे, सावर्डे, माऊस आदी भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जाणारी वाहने शहरातील कोंडीत अडकतात. त्यामुळे मालमत्तेचे नुकसान वाढण्याची शक्यता निर्माण होते.
१०८ रुग्णवाहिका सेवेची परिस्थितीही गंभीर बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. मात्र, यामागे शहरातील वाढती वाहतूक कोंडी हेच मुख्य कारण असल्याचे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी वर्ग त्रस्त
वाहतूक कोंडीचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थी वर्गावर होत आहे. सकाळी शाळेत जाताना आणि दुपारी घरी परतताना विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे त्यांना घरी पोहोचण्यास उशीर होत असून, अपघाताचा धोकाही वाढत आहे. वाळपई पोलीस वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत असले, तरी बेशिस्त वाहन पार्किंगमुळे त्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी वाहतूक नियोजन करण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात यापूर्वी सरकारकडे निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.