पणजी : पुढारी वृत्तसेवा
आपण दिलेले आश्वासन सरकार पूर्ण करत आहे. गोव्यातील सुमारे तीन लाख कुटुंबीयांना गोवा उज्ज्वला योजनेचा लाभ मिळणार असून, एका वर्षाच्या तीन मोफत एलपीजी सिलिंडरसाठी तीन हजार रुपये ९ सप्टेंबरपासून खात्यात जमा होणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी गोवा उज्ज्वला योजनेचा प्रारंभ केला. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, ५ सप्टेंबरपासून पंचायतींमध्ये आणि आमदारांकडे अर्ज उपलब्ध करून दिले जातील. ते अर्ज भरून दिल्यानंतर ९ किंवा १० सप्टेंबर रोजी खात्यात पैसे जमा होतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक पासबुक, आधार कार्ड, गॅस जोडणी पुस्तक आणि मतदार ओळखपत्राच्या प्रती अर्जासोबत जोडाव्या लागतील.
नागरिकांना जर ते दयानंद सामाजिक सुरक्षा योजना किंवा गृह आधारचा लाभ घेत असतील तर ही रक्कम ज्या खात्यात येते त्या खात्याचे पासबुकची प्रत लावावी लागेल, असे स्पष्ट केले.
खा. सदानंद शेट तानावडे म्हणाले की, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गोवेकरांना तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात दिले होते.
दिवाडी येथे पुरातन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. दिवाडी ते नार्वे दरम्यान गोवा सरकारचे पुरातत्व खाते कोटी तीर्थ प्रकल्प राबवत आहे. दि. ४ रोजी सकाळी १० वाजता दिवाडी येथे कोटी तीर्थ पूजन व मांडवी नदी पूजन व आरती होणार आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे आदींची यावेळी उपस्थिती असेल. लोकांना वाहतुकीची सोय केली आहे. लोकांनी या उपक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, आपण पर्वरी उड्डाण पुलावरून स्वतः वाहन चालवून पर्वरीला आलो. हा वेगळा आनंददायी अनुभव ठरला. दि. ६ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप भवनचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात येत आहेत.
दि. ९ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पर्वरी उड्डाण पुलाचे उद्घाटन करणार आहेत. आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकल्पाची पूर्तता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले.