पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात वाहनांची झपाट्याने वाढ होत असताना वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळात सुमारे ४० टक्क्यांची कमतरता असल्याचे वाहतूक पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे. वाढती वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बहुमजली पार्किंग, निश्चित पार्किंग क्षेत्रे आणि प्रभावी पार्किंग व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीसमोर सादर केलेल्या माहितीनुसार, गोव्यात सध्या १४.६ लाख वाहने नोंदणीकृत आहेत. पोलिस संशोधन आणि विकास ब्युरो (बीपीआरडी)च्या निकषानुसार प्रत्येक एक हजार वाहनांमागे एक वाहतूक पोलिस असणे अपेक्षित आहे.
मात्र, वाहतूक पोलिसांच्या कमतरतेमुळे कार्यरत पोलिसांवर ताण वाढत आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडे ७४४ कर्मचारी कार्यरत असून आवश्यक संख्येच्या तुलनेत ६४५ पदे रिक्त आहेत.
याशिवाय विविध वाहतूक कक्षांमध्ये २७२ होमगार्ड कार्यरत असल्याची माहिती विभागाने दिली. अवजड मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र ट्रक टर्मिनस उभारण्याचीही गरज व्यक्त करण्यात आली आहे.
या ठिकाणी ट्रकचे पार्किंग, स्टेजिंग, मालाची चढ-उतार, सर्व्हिसिंग तसेच सुरक्षित थांब्याची सुविधा उपलब्ध करून देता येईल. भविष्यात हे ट्रक टर्मिनस लॉजिस्टिक्स हब म्हणूनही विकसित करता येईल, असे वाहतूक पोलिस विभागाने समितीसमोर नमूद केले आहे.