पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात १ ऑगस्टपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ई-चलाण जारी करण्यास सुरुवात होणार आहे. यासोबतच प्रत्येक वाहनासाठी वैध थर्ड-पार्टी विमा असणे बंधनकारक असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एआय ट्रॅफिक कॅमेरा प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीला या कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनांची नोंद होईल आणि १ ऑगस्टपासून स्वयंचलित ई-चलाण जारी केले जातील. वाहनधारकांनी थर्ड-पार्टी विमा वैध ठेवणे कायद्याने बंधनकारक असून विम्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही वाहतूकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वाहन क्रमांक प्लेटमध्ये छेडछाड करणाऱ्या किंवा नंबर प्लेट झाकून एआय कॅमेऱ्यांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिस आणि एआय कॅमेरा प्रणालीद्वारे स्वतंत्रपणे दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.