पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्यापूर्वी खात्याने तसेच मी स्वतः देखील त्याचा सखोल अभ्यास केला आहे. स्मार्ट मीटरमुळे जनतेचाच फायदा होणार आहे, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मंत्री ढवळीकर यांनी गुरुवारी अखिल भारतीय स्थानिक प्रशासन संस्थेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आधुनिक गोष्टी लागू करण्यात गोवा देशात आघाडीवर आहे.
येथील जनतेला अद्याप स्मार्ट मीटरचे फायदे माहिती नाहीत. आम्ही केंद्र सरकार, जेईआरसीच्या नियमांनुसारच स्मार्ट मीटर बसवत आहोत. त्यामुळे या विषयावर आता कोणतीही चर्चा होणार नाही. मीटर बसवल्यावर त्याचा निकाल चांगलाच येईल, अशी आमची खात्री आहे. त्यानंतर आम्ही याबाबत चर्चा करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीविषयी चुप्पी
फोंडा पोटनिवडणुकीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. विधानसभा अधिवेशनाबाबत कॅबिनेट योग्य तो निर्णय घेईल. अंतिम निर्णयाचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना आहे.