पाणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल पठारावर सरकार तर्फे युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभबांधण्याचे ठरले होते, युनिटी मॉल साठी मोठमोठे खड्डे मारले गेले होते. मात्र, चिंबलच्या लोकांनी येथे आंदोलन करून दोन्ही प्रकल्प सरकारला मागे घेण्यास भाग पाडले. मात्र सदर ठिकाणचे लावलेले पत्रे अद्यापही तसेच असून आतील भागांत मोठमोठे खड्डे मारलेले आहेत.
पावसाळ्यामध्ये सदर खड्ड्यातील माती खाली शेतांमध्ये जाऊन शेती खराब होणार आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित हे पत्रे काढावेत व खड्डे बुजवून जमीन समांतर करावी; अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा चिंबल नागरिक समितीचे प्रमुख गोविंद शिरोडकर यांनी दिला आहे. ते म्हणाले की, येथे होऊ घातलेले दोन्ही प्रकल्प आम्ही आंदोलन करून मागे घेण्यास भाग पाडले.
मात्र, प्रकल्पाच्या ठिकाणी लावलेले पत्रे अद्याप तसेच आहेत ते सरकारने काढावेत व खड्डे बुजवावेत. पंचायतीकडे सरकारने परवाना शुल्कासाठी भरलेले दीड कोटी रुपये परत करू नयेत, अशी मागणी शिरोडकर यांनी केली. पुढील सात दिवसांत पत्रे काढले नाहीत, तर पुन्हा सदर ठिकाणी आंदोलन केले जाईल, असा इशारा शिरोडकर यांनी दिला.