पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात यंदाच्या जून महिन्यात सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्जन्यतूट काही प्रमाणात भरून निघाली असली, तरी महिन्याच्या सुरुवातीच्या कोरड्या हवामानामुळे मान्सूनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही.
जून महिना सामान्यतः पावसाचा मानला जातो; मात्र यंदा मान्सूनला अपेक्षित वेग आणि सातत्य लाभले नाही. बुधवारी राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या, मात्र त्यात सातत्य नव्हते. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ५ जून रोजी गोव्यात नैऋत्य मोसमी पावसाचे अधिकृत आगमन झाले.
त्यानंतर जवळपास दोन आठवडे पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पर्जन्यतूट वाढली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र मान्सून सक्रिय झाला. या कालावधीत राज्यात सरासरी ४२.३ मिमीच्या तुलनेत ८८.१ मिमी पावसाची नोंद झाली, म्हणजेच १०८.५ टक्के अधिक पाऊस पडला.
उत्तर गोव्यात आठवडाभरात ८९.९ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा १०१.३ टक्के अधिक होता. राज्यातील पाच केंद्रांवर १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मंगळवारी झालेल्या पावसात मडगाव येथे सर्वाधिक १२६.१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर साखळी (११८.४ मिमी), सांगे (११०.४ मिमी), केपे (११० मिमी) आणि धारबांदोडा (१०४.४ मिमी) येथे मुसळधार पाऊस झाला. याशिवाय वाळपई (८९.२ मिमी), पेडणे (८९.२ मिमी),
म्हापसा (८९ मिमी), एला (८६.२ मिमी), काणकोण (७४.४ मिमी), फोंडा (७० मिमी) आणि पणजी (६७.४ मिमी) येथेही चांगल्या पावसाची नोंद झाली. मुरगाव (५०.२ मिमी) आणि दाबोळी (४६.६ मिमी) येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
१ जून ते ३० जून या कालावधीत राज्यात सरासरी ९१४ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ६०३.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे महिन्याच्या अखेरीस मुसळधार पाऊस झाल्यानंतरही राज्यात जूनअखेर ३४ टक्के पर्जन्यतूट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून १ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे