पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पर्यटन खात्याअंतर्गत बेरोजगार युवकांना किनारी भागात हंगाम स्वरूपात पर्यटन हंगामात शेंक व्यवसाय थाटण्यासाठी पर्यटन खाते परवाने देते. तीन वर्षांच्या कालावधीत एकाला लॉटरीपद्धतीने रॉक व्यवसाय करण्यास परवाना मिळतो. मोरजी, आश्वे मांद्रे, हरमल, केरी किनाऱ्यावर स्थानिक युवक हा व्यवसाय करतात. पर्यटन खात्याअंतर्गत ३१ मेपर्यंत रॉक्स रेस्टॉरंट चालवण्यासाठी परवाना देण्यात आला होता.
मात्र, या व्यावसायिकांनी रॉक व्यवसाय अगोदरच गुंडाळण्यास सुरुवात केलेली आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात व्यवसाय समाधानकारक झाल्याची प्रतिक्रिया मोरजीचे माजी सरपंच आणि रॉक व्यावसायिक पवन मोर्जे यांनी दिली. व्यावसायिक पवन मोर्जे यांनी सांगितले की, यंदा मोरजी किनारी भागात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. पर्यटन खाते वन विभागाकडूनही कोणत्याच अडचणी निर्माण न झाल्यामुळे यंदाचा रॉक व्यावसाय समाधानकारक झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पर्यटन खाते दरवर्षी किनाऱ्यावर पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा पुरवण्याची ग्वाही देते; पुढे त्याची अंमजबजावणी योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. यंदाचा पर्यटन हंगाम चांगल्या प्रकारे झाला. या किनाऱ्यांवर पार्किंग व्यवस्था, चेंजिंग रूम या सोयी सुविधा नसतानाही स्थानिक व्यावसायिकांनी आपल्या पद्धतीने ग्राहकांची गैरसोय होणार नाही, यासाठी योग्य त्या दक्षता घेतली.
सध्या किनाऱ्यावर सरकारने परवाने दिलेले रॉक व्यावसायिकांनी गुंडाळलेले आहेत. तर खासगी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स अद्यापही सुरू आहेत. खासगी जमिनीत लाकडी पलंग खुर्चा घालण्यास परवाने दिलेले नसतात; परंतु आजही जर किनाऱ्यावर फेरफटका मारला तर लाकडी पलंग खुर्चा किनाऱ्यावर दिसून येतात. त्यांना कोण मुभा देतो, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पेडणे तालुक्यातील केरी, तेरेखोल, हरमल, मांद्रे, आश्वे मोरजी या किनाऱ्यावर खासगी जमिनीत असलेले रिसॉर्ट, रेस्टॉरंट वर्षाच्या ३६५ दिवसही चालतात. त्या आस्थापनांत हजारो बेरोजगार युवकांना युवती ना महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम हे व्यावसायिक करतात. बदलत्या वातावरणामुळे वादळी वाऱ्यामुळे रॉक व्यावसायिकांनी व्यवसाय अगोदरच गुंडाळल्याचे चित्र दिसून येते मात्र खासगी जागेमधील व्यवसाय सुरू आहे. त्यांचे लाकडी पलंग खुर्चा किनाऱ्यावरच आहेत.
पर्यटकांना व्हिसा, महागाईचा सामना म्हामल
रिसॉर्टचे व्यवस्थापक हरी म्हामल यांनी सांगितले की, पर्यटन हंगामात अनेक पर्यटकांना गैरसोयी अडचणी निर्माण होतात. त्यावर मात्र सरकारने आणि स्थानिक पंचायतीने पुढाकार घेऊन या गैरसोयी दूर करण्याची गरज आहे. पर्यटकांना व्हिसा तसेच वाढलेल्या महागाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्यटकांची काही प्रमाणात घट होत आहे. यावरही सरकारने विचार करून विदेशी पर्यटकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात या किनारी भागात पर्यटक आले, तर स्थानिक युवकांसह इतर व्यावसायिकांनाही चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळू शकतो, असे हरी म्हामल म्हणाले.
पार्किंग नसल्यामुळे मोठ्या गैरसोयी : शेटगावकर
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशांतील काही नागरिक स्वतःची वाहने भाडेतत्वावर घेऊन किनाऱ्यावर येतात; परंतु या वाहनांना पार्किंग नसल्यामुळे पर्यटक नाराज होताता. मिळेल त्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी करतात. त्यानंतर वाहतुकीला अडथळे निर्माण करतात. त्यासाठी सरकारने प्रत्येक पर्यटन स्थळाकडे पार्किंग व्यवस्था करून होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी नारायण शेटगावकर या व्यावसायिकांनी केली आहे.