पणजी : पुढारी वृत्तसेवा
सर्पदंशविरोधी लस दोन्ही जिल्हा इस्पितळात तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या लसीच्या उपलब्धतेबाबत आरोग्य खात्याच्या संचालकांना विचारणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिली.
अधिकऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मान्सून काळात स्थानिक पातळीवर तातडीच्या कामांसाठी पंचायत, नगरपालिका तसेच तिन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पावसामुळे रस्ते, जलनिस्सारण, वीजपुरवठा किंवा अन्य मूलभूत सेवांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी त्वरित सोडवण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अधिक जलद सेवा मिळावी यासाठी प्रतिसाद कालावधी सहा मिनिटांपर्यंत कमी करण्याचे सरकारचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून तांत्रिक आणि मनुष्यबळाची तयारी केली जात आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या 'आपदा मित्र' आणि 'सखी' स्वयंसेवकांना प्रोत्साहन म्हणून प्रतिदिन ७५० रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे. आपत्तीच्या काळात स्थानिक स्तरावर मदत, बचावकार्य आणि नागरिकांना सहाय्य करण्यामध्ये या स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. सरकारच्या या उपाययोजनांमुळे यंदाच्या मान्सूनमध्ये संभाव्य संकटांचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पावसाळ्यात रस्ते खोदण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षितता आणि वाहतुकीत अडथळे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पावसाळ्यात रस्ते खोदल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते तसेच अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे कोणत्याही विभागाला किंवा संस्थेला पावसाळ्यादरम्यान रस्ते खोदण्यास परवानगी दिली जाणार नाही.
चिरेखाणीमध्ये पोहण्यास जाऊ नका
मुख्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना खाणींच्या खोल खड्यांमध्ये किंवा बंद पडलेल्या વિડ્ડયામધ્ય चिरेखाणीमध्ये पोहण्यास जाऊ नये, असे आवाहन केले. अशा ठिकाणी पाणी साचल्यामुळे गंभीर दुर्घटनांचा धोका असतो. काही ठिकाणी प्रशासनाने आधीच सुरक्षेसाठी कुंपण उभारले असून, इतर धोकादायक भागांमध्ये इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी अशा ठिकाणांपासून दूर राहावे, असेही त्यांनी नमूद केले.