पणजी : पुढारी वृत्तसेवा
मागील २४ तासांत राज्यात सरासरी २३.९ मिमी पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत राज्यात पावसाने ३० इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. राज्यात ३०.३८ इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून पावसाचा तुटवडा २७ टक्के आहे. पुढील चार दिवस राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने ९ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.
सासष्टी, डिचोली, सत्तरी, काणकोण तालुक्यात पडझड तसेच मोठी हानी झाली. मागील दोन-चार दिवसांपासून जोरदार सुरू असलेला पाऊस आता काही प्रमाणात मंदावला असला, तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम असून थोड्या थोड्या वेळाने तो पडत आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडला, तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पडला.
राज्यात शनिवारी सकाळपासून पावसाने काही भागांत जोरदार हजेरी लावत अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, गटारे तुडुंब भरून वाहू लागली, तर काही ठिकाणी झाडे व वीजखांब कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, गेल्या २४ तासांत वाळपई येथे सर्वाधिक म्हणजे ६६.४ मिमी पाऊस पडला, तर पणजी आणि काणकोणमध्ये सर्वात कमी म्हणजे ४.२ मिमी पाऊस पडला.