पणजी : पुढारी वृत्तसेवा
'माझे घर' योजनेसाठीचे अर्ज भरून देताना विविध दाखले मिळवण्यास बराच वेळ लागत असल्याने लोकांच्या विनंतीनुसार माझे घर योजनेचे अर्ज भरुन देण्यासाठीचा कालावधी आणखी वर्षभराने वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गुरुवार शून्य प्रहराला आमदार केदार नाईक यांनी याबाबतचा प्रश्न मुद्दा उपस्थित केला असता डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली. नाईक यांनी माझे घर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोमुनिदादकडून दाखले मिळण्यास उशीर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी रस्त्यावर आणि समुद्रकिनाऱ्यांवर वाढलेल्या मोकाट गुरांमुळे अपघात वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. संकल्प आमोणकर यांनी मुरगावात जागांचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्यांना जागा घेऊन घर बांधणे शक्य होत नसल्याचे सांगत जागांचे दर कमी करण्याची मागणी केली.
आमदार जीत आरोलकर यांनी मांद्रे नदीच्या पडझड झालेल्या किनाऱ्यांची बांधणी करण्यासाठी ना हरकत दाखले मिळत नाहीत. त्यावर सरकारने तोडगा काढावा, अशी मागणी केली. नीलेश काब्राल यांनी वाढत्या चोऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.
आपत्कालीन सामग्री खरेदी करा : आलेमाव
दक्षिण गोव्यात हल्लीच एक गॅसचा टँकर रस्त्यावर उलटला आणि गोव्याकडे आपत्कालीन यंत्रे नसल्यामुळे इतर राज्यातून यंत्रे आणेपर्यंत रस्ता १८ तास व रेल्वे पाच तास बंद ठेवावी लागली. गोव्यासारख्या प्रगत राज्यात अशा प्रकारे आपत्कालीन यंत्रांची कमतरता योग्य नाही. सरकारने आपत्कालीन यंत्रणा खरेदी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.