पुढारी वृत्तसेवा
आदिवासी तथा एसटी हे गोव्याचे मूळ लोक आहेत. इतर समाजाच्या नेत्यांना आणि लोकांना जसे आपल्या समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते, तसेच एसटी समाजाच्या नेत्यांना व लोकांना वाटणे स्वाभाविकच आहे. गोव्यातील सोळा मतदारसंघांमध्ये एसटी समाजाचे लोक राहतात. आता एसटी समाजासाठी राजकीय आरक्षण मिळत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितपणे एसटी समाजाचा मुख्यमंत्री गोव्यात होईल, असा आशावाद प्रियॉळचे आमदार गोविंद गावडे यांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावडे म्हणाले की, एसटीचे लोक, नेते, कार्यकर्ते आता शिक्षित झालेले आहेत. एसटी नेत्यांनी आपले राजकीय नेतृत्व व कर्तृत्व वारंवार सिद्धही केले आहे. त्यामुळे येत्या काळात एसटीच्या नेत्यांना निश्चितपणे मुख्यमंत्रिपद लाभेल हा आपल्याला विश्वास आहे.
उत्तर गोव्यात फोंडा तालुक्यातील प्रियॉळ, मडकई व कुंभारजुवा सोडल्यास दक्षिण गोव्यामध्ये एसटी लोकांची संख्या जास्त असल्याचे सांगून गोव्यात जिल्हा पंचायत व पंचायत निवडणुकीवेळी गोव्यामध्ये नेमकी किती एसटी मतदार आहेत, ते कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये आहेत त्याची माहिती राज्य सरकारने जमलेली आहे.
त्याच निकषावर राजकीय आरक्षण मिळू शकते. सरकारने प्रक्रिया जलद केली तर अडीच ते तीन महिन्यांमध्ये राजकीय आरक्षण आणि नेमके किती मतदारसंघ हे जाहीर होऊ शकतात. सरकारने आपल्याकडे असलेले आकडेवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्याची गरज असल्याचे गावडे यांनी नमूद केले.
विविध विचारांचे आदिवासी नेते उटाच्या झेंड्याखाली एकत्र आल्यामुळे ही मागणी पूर्ण झाल्याचे गावडे एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.
एसटीसाठीच्या राजकीय आरक्षणाला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एसटींना दिलासा देणारा हा नियम असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.
२००३ मध्ये गावडा, कुणबी व वेळीप या समाजाला एसटीचा दर्जा भारतीय जनता पक्षाने दिला, आता राजकीय आरक्षण ही भाजपने दिले आहे. राज्यात सध्या जे चार एसटी आमदार आहेत, त्यातील तीन भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले आहेत. एक भाजपच्या पाठिंब्याने निवडून आलेला आहे. यावरून राज्यातील एसटी मतदार भाजपच्या मागे असल्याचे सिद्ध होत असल्याचे गावडे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
गोव्यात भाजप सरकारने चांगले काम केले आहे. वातावरणही भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भाजपने मगो पक्षासोबत युती करण्याची गरज नाही, असे आपले मत असल्याचे आमदार गोविंद गावडे यांनी युतीवर बोलताना सांगितले.