career  
गोवा

Goa IT sector impact on joint family system | शिक्षण गोव्यात, करिअर बाहेर

एकत्र कुटुंबपद्धतीवर परिणाम; आयटी क्षेत्रामुळे बदलतेय गोव्याची कुटुंबव्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

Goa IT sector impact on joint family system

पणजी : काव्या कोळस्कर

गोवा म्हटले की पर्यटन, समुद्रकिनारे आणि निवांत जीवनशैली हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र गेल्या काही वर्षांत गोव्यातील तरुणांच्या करिअरच्या निवडीमध्ये मोठा बदल दिसून येत आहे. अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमता (एआय) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) या शाखांकडे विद्यार्थ्यांचा मोठा ओढा वाढत असला, तरी गोव्यात पुरेशा प्रमाणात आयटी उद्योग किवा मोठे टेक हब उपलब्ध नसल्याने बहुसंख्य युवक-युवतींना शिक्षणानंतर परराज्यात जावे लागत आहे.

पुणे, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याने गोव्यातील बहुतांश तरुण मंडळी तेथे स्थायिक होत आहेत. विशेष म्हणजे, आयटी क्षेत्रात काम करताना त्यांचे विवाहही त्याच क्षेत्रातील सहकाऱ्यांशी होत असून, लग्नानंतर कायमस्वरूपी तिथेच परराज्यात राहण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा थेट परिणाम गोव्याच्या पारंपरिक एकत्र कुटुंब व्यवस्थेवर होत असल्याचे सामाजिक अभ्यासकांचे मत आहे. पूर्वी एकाच घरात तीन पिढ्या राहत असत; मात्र आता वृद्ध आई-वडील गोव्यात आणि मुले नोकरीनिमित्त परराज्यात असे चित्र राज्यातील अनेक घरात दिसू लागले आहे.

तरुणांच्या स्थलांतरामुळे गोव्यातील अनेक वृद्ध पालक मानसिक तणाव, एकटेपणा आणि आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जात आहेत. मुले परराज्यात असल्याने अचानक उद्भवणाऱ्या आरोग्य किंवा तत्काळ समस्यांमध्ये तातडीची मदत मिळणे

गोव्यात आयटी उद्योग उभारण्याची गरज तज्ज्ञांच्या मते, गोव्यात आयटी पार्क, स्टार्टअप इकोसिस्टीम, संशोधन केंद्रे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची गुंतवणूक वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. रोजगाराच्या मर्यादित संर्धीमुळे पारंपरिक कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे.

आधुनिक काळात मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत अतिदक्ष असलेले पालक मुलांच्या भावनिक- मानसिक विकासाबाबत कमालीचे अनभिज्ञ आढळून येतात. पूर्वीच्या पिळ्यांना घरातून सबूरी बाळगण्याचे कौशल्य, नाही पचवण्याचे कौशल्य, भावनिक नातेसंबंध राखण्याचे कौशल्य आदी कौशल्ये मिळत होती, जे आता खंडित झाले आहे.

- डॉ. रूपेश पाटकर, मानसोपचारतज्ज्ञ

विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षणासाठी परराज्य किंवा परदेशात जावे लागणे याला पर्याय नाही. मात्र, पालक आणि तरुणांनी कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शारीरिक अंतर वाढले तरी एकमेकांप्रति संतुलन साधत प्रेम आणि आदर जपून ठेवत काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक आहे.

- गीतांजली लेले, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT