होंडा : पुढारी वृत्तसेवा
यापूर्वी खाण व्यवसायामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन जनजीवन विस्कळीत झाले, मात्र त्याचा कोणताही फायदा सोनशी गावाला झाला नाही. उलट हक्कांसाठी लढा उभारल्यावर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून कोळवाळ तुरुंगात पाठवले होते. त्यामुळे यापुढे सोनशी गावातील खाण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा खाण व्यवसायाला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा ग्रामसभेत देण्यात आला.
सुमारे ४५ ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन पंचायतला सादर करण्यात आले असून, संबंधित खाण कंपनीला कोणत्याही प्रकारचा 'ना हरकत दाखला' देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. होंडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच शिवदास माडकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात पार पडली.
यावेळी उपसरपंच सिया बोडके, पंच सदस्य रेश्मा गावकर, कृष्णा गावकर, सुमेधा माडकर, स्मिता मोटे, दिपक गावकर, प्रमोद गावडे, पंचायत सचिव मुला वरक तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या वतीने निरीक्षक म्हणून गौरेशराव राणे उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी सरपंच शिवदास माडकर यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. पंचायत सचिव मुला वरक यांनी मागील सभेचा वृत्तांत तसेच सन २०२५-२६ चा जमा-खर्च सादर करून त्यास मान्यता घेतली.
ग्रामसभेत सोनशी गावातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा करताना ग्रामस्थांनी सांगितले की, ई-लिलाव प्रक्रियेद्वारे जीएसडब्ल्यू या आस्थापनाने संबंधित खाण घेतली आहे. मात्र, खाण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी गावातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामस्थांचा या खाणीला पूर्ण विरोध राहील.
तसेच पंचायतने संबंधित कंपनीला कोणताही ना हरकत दाखला देऊ नये, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. यावर सरपंच शिवदास माडकर यांनी सांगितले की, ग्रामस्थांचे निवेदन उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. यावेळी गावातील काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकल्यामुळे अस्वच्छता पसरत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
खुल्या जागेत कचरा टाकणाऱ्यांवर पंचायतने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सरपंचांनी दिले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या स्वयंसंज्ञान याचिकेनुसार भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायत स्तरावर उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे पंचायत सचिव मुला वरक यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी पंच दिपक गावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.