पणजी : म्हादई नदीच्या प्रश्नावर गोवा सरकार गंभीर नसून, जलसिंचन खात्याचे अधिकारी निर्मला सावंत म्हादईच्या नावावर केवळ सहली करत आहेत. म्हादई वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कृती होत नाही. आता कर्नाटक म्हादईच्या मुद्द्यावर मैत्रीचे आमिष दाखवत आहे. गोवा सरकारने या आमिषाला भुलू नये, असे प्रतिपादन म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्ष तथा माजी मंत्री निर्मला सावंत यांनी केले.
पणजी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रा. राजेंद्र केरकर आणि अविनाश भोसले उपस्थित होते. निर्मला सावंत म्हणाल्या की, कर्नाटकचे मंत्री गोवा आणि कर्नाटकने मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून म्हादईचा प्रश्न सोडवावा, असे सांगत आहेत. मात्र, म्हादई प्रकल्पाची पायाभरणी करताना त्यांना ही मैत्री आठवली नव्हती. कळसा नाल्याचे पाणी वळवताना तसेच आता भांडुरा येथे प्रकल्पाचे काम सुरू करतानाही मैत्रीची आठवण झाली नाही. त्यामुळे गोव्याने कर्नाटकच्या मैत्रीच्या आमिषाला भुलू नये, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले की, कर्नाटकने कणकुंबी येथे साडेतीन किलोमीटर लांबीचा बोगदा खणून कळसा नाल्याचे पाणी मलप्रभा नदीत वळवले आहे. आता म्हादई अभयारण्य, भीमगड अभयारण्य तसेच इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असलेल्या भांडुरा नाल्याचे पाणी वळवण्याचे काम सुरू केले आहे.
या प्रकाराकडे गोवा सरकार कानाडोळा करत असून, सरकारची भूमिका 'अळीमिळी गुपचिळी' अशी असल्याचा आरोप केरकर यांनी केला. कर्नाटकाच्या कथित बेकायदेशीर कृत्यांचा गोव्याने सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे भांडाफोड केल्यासच म्हादईचे संरक्षण होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटकचे खासदार मोठ्या संख्येने असल्यामुळे केंद्र सरकार कर्नाटकची बाजू घेत असल्याचा संशयही प्रा. केरकर यांनी व्यक्त केला.