पणजी : कचरामुक्त व विकसित गोव्यासाठी जिल्हा पंचायत सदस्य व पंचांनी एकमेकाच्या सहकार्याने काम केल्यास कचरामुक्त व विकसित गोवा आणि विकसित भारताचे ध्येय साध्य होईल. त्यामुळे कचरामुक्त गोव्यासाठी काम करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बुधवारी कला अकादमीमध्ये आयोजित राष्ट्रीय पंचायत दिन संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वाहतूक व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, पंचायत संचालक महादेव आरोंदेकर, उपसंचालक प्रसिद्ध नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष रेश्मा बांदोडकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धांत गावस देसाई व कचरा नियंत्रण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरीश अडकोणकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, विकसित गोवा व विकसित भारत होण्यासाठी गोवा कचरामुक्त झाला पाहिजे. त्यासाठी जि. पं. सदस्य व पंचांचे योगदान महत्त्वाचे आहे. राज्य सरकार कचरामुक्त गोव्यासाठी करोडो रुपये खर्च करते. रस्त्याकडेचा कचरा उचलण्यासाठी वर्षाला पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जातो. काही लोक अद्यापही रस्त्याकडेला कचरा टाकतात. पंचांनी लक्ष ठेवून घरोघरी कचरा जमा करण्याचे उपक्रम यशस्वी करावेत. ते म्हणाले, राज्यात मोकाट गुरांचा प्रश्नही गंभीर आहे. लोकांनी आपली गुरे सांभाळावीत किया गोशाळेला द्यावीत
कारण, रस्त्यांवर गुरांमुळे अपघात झाल्याने आजवर अनेकांचे प्राणही गेले आहेत. त्यामुळे गुरांच्या मालकांनी काळजी घ्यावी. कंत्राटदार मोठ्या प्रमाणात घरोघरी कचरा गोळा करतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रेकिंग सिस्टीम राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
२४ फ्लॅटच्या इमारतीला एसटीपी सक्ती
पंचायत क्षेत्र असो किंवा पालिका क्षेत्र २४ फ्लॅट किंवा त्यापेक्षा जास्त सदनिका असलेली इमारतींनी स्वतःची एसटीपी स्थापन करायला हवी. पंच सदस्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी व एसटीपी उभारत नाहीत त्यांना परवाने देऊ नयेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.