पणजी: पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) हल्लीच्या ताज्या अहवालामुळे गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केलेले आरोप एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाले असून, डबल इंजिन सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते दुर्गादास कामत यांनी केला आहे. कामत म्हणाले की, एनसीआरबी अहवालात गोव्यात बलात्कार, सायबर गुन्हे आणि अमलीपदार्थ तस्करीच्या
घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकार आणि पोलिस या दुर्गादास कामत वाढलेल्या गुन्हे नोंदींचे कारण 'जास्त तपास आणि शोधमोहीम' असल्याचे सांगत असले तरी, त्याचवेळी वाढलेल्या निर्दोष मुक्ततेच्या प्रमाणामुळे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कामत म्हणाले, गुन्ह्यांचा तपास आवश्यक गांभीर्य आणि सखोलतेने केला जात नसल्यामुळे आरोपी शिक्षा टाळण्यात यशस्वी होत आहेत.
त्यामुळे सरकारचे सुशासन, विकास आणि सुरक्षिततेचे दावे फोल ठरत आहेत. विधानसभेत गृह खात्याच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान विजय सरदेसाई यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा उल्लेख करताना कामत म्हणाले की, एनसीआरबी अहवालामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाची भूमिका योग्य ठरली आहे. गेल्या चार वर्षांपासून सरदेसाई सातत्याने वाढते गुन्हे, अमलीपदार्थ तस्करी आणि कमकुवत होत चाललेली कायदा अंमलबजावणी याबाबत सरकारला इशारा देत असल्याचे त्यांनी सांगितले. कामत म्हणाले की, प्रशासनाने
सुशासनाऐवजी कार्यक्रम आणि प्रसिद्धीवर अधिक भर दिला आहे. ईएसजीमार्फत झालेल्या खर्चाच्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी सार्वजनिक पैशांचा अपव्यय होत असताना गुन्हेगारी मात्र नियंत्रणाबाहेर जात असल्याचे म्हटले. मिरामार येथे मॅग्रोव्ह भूभाग भराव प्रकरणाच्या पाहणीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी उल्लेख केला. एनसीआरबीच्या अहवालानंतर घडलेली ही घटना राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे आणखी एक उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
पर्यटनावर गंभीर परिणामाची शक्यता...
गोव्याच्या पर्यटन प्रतिमेवरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देत कामत म्हणाले की, गुन्हेगारीचा दर वाढत राहिल्यास गोव्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होऊ शकते आणि परदेशी देशांकडून प्रवास सल्ले (ट्रॅव्हल अडव्हायझरी) जारी होण्याची शक्यता निर्माण होईल.