पणजी : राज्यातील मासेमारी बंदीचा बिगुल वाजला. राज्यात आजपासून मासेमारी बंद होणार असून ३१ जुलैपर्यंत बंदी असणार आहे. त्यामुळे समुद्रातील मासे रोजच्या जेवणात वापरणाऱ्या मत्स्यखवय्यांना आता खाडीतील आणि गोड्या पाण्यातील माशांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यावर्षी मान्सून लांबणीवर पडला आहे. मे महिन्यात पडणारा वळीव पाऊस आणि मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने अजूनही मासेमारीसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र, मत्स्यप्रजातींच्या प्रजननाचा काळ असल्याने मासेमारी बंदी आवश्यकच आहे.
शेजारील महाराष्ट्र राज्यात तर यावर्षी मत्स्य प्रजातींचा प्रजनन काळ लक्षात घेऊन मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामुळे मत्स्य उत्पादनात वाढ होण्याची आशा महाराष्ट्र सरकारला आहे. गोव्यानेही तसा विचार करावा, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.