गोवा

Goa Farmers | मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला

Goa Farmers | हरमल परिसरात पेरणीला वेग; मोफत बियाणे, खतांमुळे प्रोत्साहन

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांच्या खंडानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने चिंतेत असलेल्या हरमल परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणी आणि लागवड कधी सुरू होणार, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता शेतीकामांना वेग दिला असून, परिसरात पेरणी व लागवडीची कामे उत्साहात सुरू झाली आहेत.

हरमल येथील प्रगतिशील शेतकरी दत्ताराम ठाकूर यांनी सांगितले की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. काहीसा उशीर झाला असला, तरी पारंपरिक पद्धतीने सर्व शेतकरी पेरणी व लागवडीच्या कामाला लागले असून, मागील काही दिवसांपासून असलेली अनिश्चितता दूर झाली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खतांचे वाटप करून शेतीला प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः पेडणे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ झाल्याबद्दल त्यांनी संबंधितांचे आभार मानले. शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात असला, तरी अशा प्रकारच्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले.

सरकारने दरवर्षी विशेष कृषी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना अधिक बळ द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे शेतीला चालना मिळून भारत सुजलाम सुफलाम, आत्मनिर्भर आणि गोवा स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीजमिनी पडीक असल्याचे दिसून येत असून, त्या पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शेतकी खात्याने विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडलेल्या 'स्वयंपूर्ण गोवा' संकल्पनेला सर्वांनी सहकार्य करून राज्याचा हिरवागार वारसा जपण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही दत्ताराम ठाकूर यांनी केले.

काणकोण तालुक्यात शेतीकामांना वेग

यंदाचा जून महिना बहुतांश काळ पावसाच्या प्रतीक्षेत गेल्याने काणकोण तालुक्यातील शेतकरी चिंतेत होते. महिन्याच्या सुरुवातीला चार-पाच दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर तब्बल २० ते २२ दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, आता दमदार पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे. यापुढे पाऊस खंड न पडता सुरू राहील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाअभावी पेरणी आणि लागवडीची कामे उशिराने सुरू झाली असून काही शेतकऱ्यांची रोपेही खराब झाली आहेत. त्याची नुकसानभरपाई मिळणे कठीण असल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

उंच भागातील मुरमाड जमिनीत पाण्याअभावी शेतीची कामे सुरू करता आली नव्हती. आता सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने एकाच वेळी ट्रॅक्टरची मागणी वाढणार असून त्यातून नवीन अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी काही शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणेही वाया गेल्याची माहिती शेतकरी कुशाली वेळीप यांनी दिली. सध्या पाऊस नियमित सुरू झाल्याने पेरणीच्या कामांना गती मिळत असून शेतीकामे हळूहळू मार्गी लागत आहेत. सध्याचा पाऊस शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे काणकोण विभागीय कृषी अधिकारी महेंद्र पागी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT