डिचोली : पुढारी वृत्तसेवा
सरकारी अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता थेट जनतेशी संवाद साधावा, गावागावांत बैठका घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती द्यावी आणि कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. साखळी येथे आयोजित 'आधुनिक तंत्रज्ञान व नव्या संधी' या राज्यस्तरीय कृषी अधिवेशनात ते बोलत होते.
कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी खात्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि राज्याच्या विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शेतकरी हा अन्नदाता आहे. केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविण्यात येत आहेत.
पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनाबरोबरच उत्पन्नातही लक्षणीय वाढ होऊ शकते. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि त्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी कृषी खाते आणि नेपॅकॉन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
हा करार राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान, तांत्रिक मार्गदर्शन, संशोधनाधारित शेती पद्धती तसेच केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठीही या कराराचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला अनुदानासाठीचे अर्ज मंजूर झाल्यानंतर शक्यतो दोन महिन्यांच्या आत संबंधित शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचे निर्देश दिले. हरित गोवा अभियानाला चालना देण्यासाठी बांबू, भाजीपाला, मसाले, हळद तसेच इतर नगदी पिकांच्या उत्पादनावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
समूह शेती, नैसर्गिक शेती, गोमूत्र व शेणखताचा वापर वाढवून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. 'स्वयंपूर्ण गोवा' अभियान यशस्वी करण्यासाठी स्थानिक उत्पादन वाढविणे आवश्यक असून त्यात शेतकऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमास जिल्हा सदस्य सुंदर नाईक, महेश सावंत, पद्माकर माळीक, कृषी खात्याचे अधिकारी, कृषी तज्ज्ञ तसेच शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनासह विविध उपक्रमांचे उद्घाटन केले.
भाजीपाला उत्पादनात पाच कोटींची वाढ : शेट आमदार
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी कृषी क्षेत्रात सरकारने अनेक सकारात्मक उपक्रम राबविल्याचे सांगून युवकांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन केले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी फळोत्पादन मंडळाच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादनात सुमारे पाच कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती दिली.