पणजी : पुढारी वृत्तसेवा
२५ जून १९७५ रोजी देशावर लादण्यात आलेली आणीबाणी हा भारताच्या लोकशाही इतिहासातील अत्यंत काळा अध्याय होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हा उल्लेख केला. आणीबाणीच्या डॉ. सावंत म्हणाले की, १९७५ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन सरकारने देशावर आणीबाणी लादल्याने लोकशाही व्यवस्थेला मोठा धक्का बसला.
या काळात नागरी स्वातंत्र्याचे निलंबन करण्यात आले, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यात आले आणि लोकशाही मूल्यांसाठी आवाज उठविणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकांनाही तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणीचा काळ हा संविधानाचे रक्षण करणे, मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे आणि लोकशाही संस्था टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशा घटनांमधून लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांनी आणीबाणीच्या जुलूमशाहीला धैर्याने प्रतिकार केला, त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आवश्यक असल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटले. लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य या तत्त्वांवर देशाची लोकशाही व्यवस्था उभी असून, त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकशाही मूल्यांचे जतन करा...
आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व लोकांना आदरांजली वाहत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी आणि संविधानिक तत्त्वांप्रति कटिबद्ध राहण्यासाठी आवाहन केले.