पणजी : गोवा शालांत मंडळातर्फे राज्यातील ३२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडली असून यंदा ९४.५१ टक्के निकाल लागला आहे. यात मुलांचा निकाल ९४.३७ टक्के तर मुलींचा निकाल ९६.५१ टक्के इतका लागला असून दरवर्षीप्रमाणे मुलीच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासोबत सचिव विद्यादत्त नाईक, सहसचिव रिमा मडगावकर आणि उपसचिव भारत चोपडे उपस्थित होते. परीक्षेला एकूण २०,६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यामध्ये १०,८१९ मुले आणि ९,८४० मुलींचा समावेश होता, त्यापैकी १०,०७२ मुले आणि ९४१४ मुली उत्तीर्ण झाल्या.
उत्तरपत्रिकेची प्रमाणित छायाप्रत घेण्याचे शुल्क ३५० रुपये प्रति प्रश्नपत्रिका असून त्याची अंतिम मुदत २ मे आहे. तसेच जर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करायचे असेल तर ७०० रुपये प्रति प्रश्नपत्रिका शुल्क असून ११ मे यासाठी अंतिम मुदत असेल, असे शेट्ये यांनी नमूद केले. तसेच पुरवणी परीक्षा ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे.