डिचोली : पुढारी वृत्तसेवा
कुडणे-साखळी येथे झालेल्या महिलेच्या निघृण खून प्रकरणाचा उलगडा करत डिचोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेपत्ता आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. दि. १९ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास कुडणे-साखळी येथील चिकणे भागात एका महिलेवर हल्ला झाल्याची माहिती डिचोली पोलिस ठाण्याला मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, शैला संजय घाडी (वय ५८, रा. चिकणे-कुडणे) या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा मुलगा शुभम संजय घाडी याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता, सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. मलईवाडी, शिरशिंगे, सावंतवाडी) याने घरात जबरदस्ती प्रवेश करून हा खून केल्याचा आरोप केला.
पोलिसांच्या आरोपीचा मृत महिलेच्या धाकट्या मुलीसोबत विवाह करण्याचा प्रस्ताव होता; मात्र हा प्रस्ताव महिलेने नाकारल्यामुळे आरोपीने वैयक्तिक वैमनस्यातून हा खून केल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर आरोपीने घरातील सोन्याची साखळी आणि मृत महिलेचा मोबाईल फोन घेऊन पळ काढला.
एवढेच नव्हे, तर आरोपीने मृत महिलेच्या मोठ्या मुलीला फोन करून खून केल्याची कबुली दिली आणि तिला व तिच्या कुटुंबीयांना माहितीनुसार, जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. शुभम घाडी यांच्या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६४/२०२६ नोंदवत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३३२ (अ), १०३, ३०९(४) आणि ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विजय व्ही. राणे सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊसकर आणि पोलिस उपनिरीक्षक आकाश परवार यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबवली. डिचोली पोलिस, महाराष्ट्र क्राईम बँच आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत ठाणे जिल्ह्यातील चेना ब्रिज-जवळ द्वारका हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. काशीगाव पोलिस ठाण्यात सायं. ५.३० वा. त्याला अधिकृत अटक केली. आरोपीला २१ मे रोजी मीरा-भाईंदर, ठाणे येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला.