सांगे : पुढारी वृत्तसेवा
भारत देश हा संविधानावर चालतो. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. जनतेचा आवाज सरकारने ऐकायलाच पाहिजे. आम्हाला जे मिळाले, ते पुढील पीढीसाठी सांभाळून ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. इनफ इज इनफ चळवळीने सुरू केलेली आंदोलन सुरूच राहणार आहे.
पोट निवडणुकीच्या निमित्ताने स्थगित केलेले विधानसभा अधिवेशनाचे कामकाज १५ दिवसांत सुरू न केल्यास 'चलो पणजी' चा नारा दिला जाईल, असा इशारा निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी दिला. सांगे बसस्थानक येथे इनफ इज इनफ चळवळी अंतर्गत आयोजित केलेल्या जाहीर सभेत रिबेलो बोलत होते.
यावेळी मंचावर सांतान रॉड्रिग्ज, माजी सरपंच संतोष गावकर, नगरसेवक मॅशू डिकॉस्टा, पंच राखी नाईक प्रभूदेसाई, मनोज पर्येकर, आसिफ हुसेन उपस्थित होते. रिबेलो की, लोक एकत्र आले की, सरकार घाबरते. सरकारने जनहिताला प्राधान्य दिले पाहिजे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी असते.
इनफ इज इनफ चळवळीने जे दहा मुद्दे सरकारसमोर ठेवले आहेत, त्यांची पूर्तता होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. मॅश्यू डिकॉस्टा म्हणाले, कुर्डीकरांना धरणासाठी घरादारांचा त्याग केला.
मात्र, अजून त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती नष्ट झाली आहे. त्यामुळे गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. राखी नाईक म्हणाल्या, आपला गोवा वाचवायचा की विकायचा? याचा विचार आपण आत्ताच करायला हवा.
कारण आता आपण गप्प बसलो तर आपल्या भावी पिढीसाठी काहीही शिल्लक राहणार नाही. यावेळी मनोज पर्येकर, संतोष गावकर, संदेश प्रभुदेसाई यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन टॉनी कार्दोज यांनी केले. यावेळी मिराबाग आंदोलकांपैकी विधानसभेत आवाज नेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.