पणजी : सडा-मुरगाव येथील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतर करण्यास सरकार तत्त्वतः तयार असून, त्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जागा निश्चित करण्यास करण्यास २५ ऑगस्टपर्यंत वेळ देत सुनावणी तहकूब केली.
पुतळा सध्याच्या ठिकाणाहून हलवून सरकारी जमिनीवर स्थापित करण्यास तत्त्वतः सहमती आहे. यासाठी दोन-तीन संभाव्य जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही जागेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पुतळा सरकारी जागेवर हलविण्याबाबत सरकारकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारने संभाव्य जागांची पाहणी करून योग्य ठिकाण निश्चित करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला.
न्यायालयाने सरकारची भूमिका नोंदवून घेत पुढील सुनावणीपर्यंत स्थलांतरासाठी योग्य जागा निश्चित करण्याची संधी दिली आहे. दरम्यान, पुतळ्याच्या स्थलांतरासाठी निवडण्यात येणारी जागा, तेथील कायदेशीर स्थिती आणि आवश्यक परवानग्या याबाबत सरकारला पुढील कार्यवाही करावी लागणार आहे. अंतिम जागा निश्चित झाल्यानंतर पुतळा सध्याच्या ठिकाणाहून हलविण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.