पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे आमदार निलेश काब्राल यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत सूचक वक्तव्य करत पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळाले तरी ते स्वीकारायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे म्हटले आहे. अखेर आपले राजकीय भवितव्य जनता ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना काब्राल यांनी भाजपमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही नाराजी व्यक्त केली. अनेक मतदारसंघांमध्ये आता 'भाजप विरुद्ध भाजप' अशी परिस्थिती निर्माण झाली असून, हा पक्षासाठी आरोग्यदायी विकास नसल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांत भाजपमध्ये मोठा बदल झाला आहे. इतर पक्षांमधून आलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जात आहे, तर पक्षाशी दीर्घकाळ निष्ठावान राहिलेल्या कार्यकर्त्यांकडे आणि विद्यमान आमदारांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत काब्राल यांनी व्यक्त केली. त्यामुळे तिकीट मिळाले तरी भाजपमधील अंतर्गत लाथाळ्या पराभवास कारणीभूत ठरू शकतात, असे ते म्हणाले.
आपल्या मंत्रिपदाचा संदर्भ देताना काब्राल म्हणाले की, आपण आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्यासाठी मंत्रिपदाचा त्याग केला होता. मात्र, त्यानंतर आपल्याबाबत कोणताही पुनर्विचार करण्यात आला नाही. निष्ठावान आमदारांना मंत्रिमंडळापासून दूर का ठेवले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर सरकारी महामंडळांमध्येही अशा आमदारांना पदे दिली जात नसल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या टीकाकारांवरही काब्राल यांनी निशाणा साधला. पर्वरी उड्डाणपुलाला ज्यांनी पूर्वी विरोध केला, तेच आता या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भाजपला जवळचे वाटत आहेत, असा आरोप त्यांनी केला. काब्राल यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चेला उधाण आले आहे. पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतरही ते निर्णयाचा पुनर्विचार करणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्याने भाजपच्या अंतर्गत राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.