सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
भाजपा दबाव तंत्राचा वापर करून इतर पक्षांचे नेते पळवून नेतो. तसेच दमदाटीने कार्यकर्तेही पळवतात. गोव्यात सध्याच्या भाजपाच्या सरकारात असलेले १२ पैकी १० मंत्री हे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसमधून भाजपात गेलेले ते नेते गद्दार आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी केली. गोवा वाचवायचा असेल तर अशा गद्दारांना मत देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
गट पातळीवरील कार्यकर्ते आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे वेर्णा येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खर्गे बोलत होते.
खर्गे म्हणाले की, देशातील इतर राज्य सरकारांच्या तुलनेत गोव्यातील भाजपा सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी आहे.
या सरकारने लाखो चौरस मीटर भातशेती, बागायतींचे भू रूपांतरण करून संबंध गोवाच विक्रीस काढलेला आहे. नद्या, दऱ्या-खोऱ्यांचे विद्रुपीकरण करून गोव्याच्या सर्वांगसुंदर पर्यावरणावर महासंकट लादलेले आहे. या सरकारचे वेळीच सत्ताहरण करणे काळाची गरज आहे. तेव्हा गोव्याच्या रक्षणाबरोबर भाजपच्या सत्ताहरणासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे हे यंदा प्रथमच गोव्याच्या भेटीवर आले आहेत. भाजपने त्यांची ही सभा रद्द करण्यासाठी अनेक युक्त्या लढविल्या. पणजीत आझाद मैदान व मडगावात दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या मैदानावर काँग्रेसने सभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती, पण सरकारने विविध कारणे पुढे करून सभेला परवानगी नाकारली.
तरी काँग्रेसने वेर्णात सभेचे आयोजन करून खर्गेची सभा यशस्वी करून दाखवली. काँग्रेस पक्ष येत्या २२ सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा सुरू करणार आहे. तेव्हा सर्वांनी या यात्रेत सहभागी होऊन काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले.
यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लोस फेरेरा, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एदुआर्दो फालेरो, माजी मंत्री फ्रान्सिस्को सार्दिन, कर्नाटकचे कृषिमंत्री नरेंद्र स्वामी, काँग्रेसचे गोवा राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मुक्तिलढ्यातही काँग्रेसचे मोठे योगदान : स्वातंत्र्याबरोबर गोव्याच्या मुक्तिलढ्यातही काँग्रेसच्या नेत्यांचे मोठे योगदान आहे, असे नमूद करून खर्गे म्हणाले, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान आणि बलिदान दिलेले आहे. भाजपच्या एकाही नेत्याने स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतलेला नाही.
गोवा राखण यात्रा : काँग्रेस पक्ष येत्या २२ सप्टेंबरपासून 'गोवा राखण यात्रा' सुरू करणार असून सर्वांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.